Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या संख्येने समाजबांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या संख्येने समाजबांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज न्यायासाठी संघर्ष करत आहे. समाजाला वारंवार आश्वासने देऊन दिशाभूल केली जात असून, आता हा प्रश्न निर्णायक टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे. 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने याच दिवशी शेवटचा आणि निर्णायक लढा उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून 58 लाख नोंदींशी संबंधित प्रमाणपत्रे अद्याप देण्यात आलेली नसल्याचा आरोप करत त्यांनी पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले. ज्या मराठा समाजातील नागरिकांच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, विविध विभागांतील भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा दावा करत त्यांनी महसूल, कृषी, नगरविकास, महावितरण तसेच इतर विभागांतील प्रभावित उमेदवारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. अन्याय झाल्याचा दावा करणाऱ्या सर्व युवकांनी संबंधित अर्ज आणि कागदपत्रांसह अंतरवाली येथे उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
