मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सण-समारंभांवरील बंदीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.