Raj Thackeray : मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? विधीमंडळातल्या राड्यानंतर राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
विधीमंडळाच्या लॉबीमध्ये काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार जितेंद्र आव्हाज आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार हाणामारी झाली. विधानभवनातील लॉबीमध्ये झालेल्या या राड्यानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे. काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची? असा एकच सवाल करत राज ठाकरेंनी घडलेल्या प्रकरणानंतर खंत व्यक्त केली आहे. भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, असेही त्यांनी म्हटलंय. मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? असा सवाल करत सरकारवरच निशाणा साधलाय.
पुढे त्यांनी असेही म्हटले की, अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? असा सवालही त्यांनी केलाय.
