विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा समारोप आज झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अध्यक्षांसमोरील हौदात भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावरुन भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. विधानसभेत झालेल्या राड्यामुळे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले बाळासाहेब थोरातही अवाक झाले आहेत, मी तर अगदीच नवखा आहे. कालचा संपूर्ण प्रकार पाहून उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतयं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावलाय. सोमवारी विधानसभेत जे काही झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजिरवाणं आहे. कालचं चित्र मान शरमेनं खाली घालणारं होतं. वेडं वाकडं वागायचं, आरडाओरड करायचा ही लोकशाही नाही. माईक असतानाही बेंबीच्या देठापासून ओरडाचं हे चूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.