मुंबईः पाकिस्तान (Pakistan) जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून काढलं पाहिजे, त्यांना असतील तिथून शोधून काढा.. असं वक्तव्य भाजप नेत्याने केलंय. यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या प्रकरणी आज आंदोलन (Pune Protest) करण्यात आलं. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा केला जातोय. यावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. अशा वर्तणुकीला, स्वभावाला ठेचून काढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या सगळ्यांना चुन चुन को पकड लो आणि एक एक करून ठेचून काढलं पाहिजे, अशी आमची मागणी गृहमंत्र्यांकडे आहे. तेदेखील हेच करतील, असा आमचा विश्वास आहे, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.