मुंबईत पावसाचा जोर वाढला; लोकल वाहतुकीवर परिणाम, मध्यरेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने

मुंबईत पावसाचा जोर वाढला; लोकल वाहतुकीवर परिणाम, मध्यरेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने

| Updated on: Jul 25, 2025 | 3:29 PM

मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे.

गणेश थोरात, प्रतिनिधी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाचा जोर वाढला, ज्याचा परिणाम लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबई पोलिसांनी “महत्त्वाचे काम नसल्यास घरीच थांबा” असे आवाहन केले आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शहराची गती मंदावली आहे. अंधेरी भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अंधेरी या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक खोळंबली आहे. मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने खबरदारी म्हणून मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १०-१२ मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील गाड्या ७-८ मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसाचा जोर आणि कमी दृश्यमानतेमुळे रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या सावधपणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Jul 25, 2025 03:29 PM