मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानंतर राज्यात खळबळ माजली होती. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा आरोप केला होता. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जुळवून घेण्यासही सांगितलं होतं. या पत्रामुळे महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज सांयकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत राज्य सरकारपुढील आव्हानांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनामध्ये भाजपला कसं सामोरं जायचं यावर देखील चर्चा होऊ शकते.