भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशा आशायाचे बॅनर लावले होते. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनेबद्दल मी आधीच सांगितलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक आहे, पण भाजपला एवढं चिडण्याचं कारण काय? भाजप हे सत्तेशिवाय जगू शकत नाही.जनतेच्या पैशांची लूटमार करणं, जीएसटी सारखा सुलतानी टॅक्स आकारून नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पाप केलं आहे. नोटबंदीच्या रुपाने देशाला विकण्याचं काम केलं जातंय. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेबद्दल भाजपला एवढा राग का आला? कारण त्यांच्या खुर्च्या आता जायची वेळ आली आहे. जसं कर्नाटकातील आमदारांची डिपॉझिट जप्त झाली. तसंच महाराष्ट्रातील भाजप आमदारांची आणि सिनिअर नेत्यांची डिपॉझिट जप्त होणार आहे. अशा पद्धतीने जर वातावरण निर्माण होतं तेव्हा मुनगंटीवार यांनी आपलं दु:ख मांडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत”, असं नाना पटोले म्हणाले.