केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगम मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यंनी त्यावर पलटवार केला आहे. केंद्रात सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स दाखवा. नाही तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं, असा टोला दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला आहे. दीपक केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. नारायण राणेंवर मला जास्त बोलायचं नाही. मात्र राणेंना केंद्रात चांगलं खातं मिळालं आहे. त्यांनी त्याचा वापर जिल्ह्यासाठी काय केला? कारण सांगता येत नाही. कोणाचं करिअर कितीही मोठं असलं तरी केंद्रामधे सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही जर परफॉर्मन्स नाही दाखवला तर तुमचं खातं जावू शकतं. केवळ राजकारण करून आपण टीकू शकतो का? याचा विचार राणेंनी केला पाहिजे. कोणतंही मंत्रीपद हे जनतेची सेवा करण्यासाठी असते. त्यांचंही करीयर मोजकचं असू शकतं. काहीच सांगता येत नाही, असा दावा केसरकर यांनी केला.