भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत…नेमका मसला काय?
महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लावलेल्या बॅनरमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या बॅनरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकची जबाबदारी स्वीकारली असल्याचा उल्लेख करत, आता छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लावलेल्या बॅनरमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या बॅनरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकची जबाबदारी स्वीकारली असल्याचा उल्लेख करत, आता छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील विविध चौकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे बॅनर झळकवण्यात आले आहेत. “नाशिकला दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावे, हीच सर्वसामान्य नाशिककरांची भावना आहे,” असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
या बॅनरबाजीमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि विकासकामांच्या मुद्द्यावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, त्याचे पडसाद आता बॅनरबाजीच्या माध्यमातूनही उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, या बॅनरनंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावर महायुतीतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यावर भाजप आणि महायुतीतील इतर नेत्यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
