कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून एकच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यावरून आता राजकारण सुरु केले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर गौरव यात्रेने राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. तर अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मला आदर आहे. मात्र सध्याच्या काळात सावरकरांकडे मुद्दा घेऊन जाण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.