लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची मोहीम आहे. या मोहिमेत प्रत्येकानं आपापली जबाबदारी चोख बजवावी. असं वक्तव्य महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. हे वक्तव्य करताना कोल्हे यांनी इतिहासाचा दाखला दिला आणि छत्रपती महाराजांच्या मावळ्यांनी केलेल्या लढाईची कोल्हे यांनी आठवण करून दिली. शिरूर लोकसभेतील जुन्नर विधानसभा मतदार संघातील ओतूर तेथे प्रचारावेळी कोल्हे यांनी असं वक्तव्य केलं. अमोल कोल्हे म्हणाले, संकट मोठंय..जसं स्वराज्यावर अफझलखान चालून आला होता. स्वराज लहान होतं. अफझलखानाकडे मोठी संपत्ती, सैन्य, साधनं होती. हे सगळं आखताना जी रणनिती महाराजांनी केली होती त्याचे उदाहरण देत मतदान करताना आपली जबाबदारी योग्य बजावण्याचं आवाहन कोल्हेंनी केलंय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, अशोक बापू पवार, संजय जगताप, सचिन आहेर आदी सोबत होते.