NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
UG-NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ने आयोजित केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनादरम्यान काही असामाजिक घटकांनी दगडफेक केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला असून, या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
UG-NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ने आयोजित केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनादरम्यान काही असामाजिक घटकांनी दगडफेक केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला असून, या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
पत्रकार परिषदेत जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी आंदोलनातील हिंसाचाराचा निषेध करत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने सांगितले की, त्या दिवशी तिचे वडील ड्युटी संपवून घरी आले तेव्हा त्यांचा खाकी गणवेश पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. त्यांच्या डोक्याला आणि दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली होती. ही परिस्थिती पाहून संपूर्ण कुटुंब हादरून गेले, असे तिने सांगितले.
दिल्ली पोलिस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पत्नी अवनीत कौर यांनीही पत्रकार परिषदेत भावना व्यक्त करत सांगितले की, 20 जुलैच्या रात्री त्यांचे पती गंभीर जखमी अवस्थेत घरी परतले. त्यांना पाहून त्या हादरल्या असून, दोन वर्षांच्या मुलीवरही या घटनेचा मानसिक परिणाम झाला. “पोलीस अधिकारी हा केवळ गणवेशातील व्यक्ती नसतो, त्याच्या मागे एक कुटुंब असते. पत्नी, लहान मुले आणि वृद्ध आई-वडील त्याच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत असतात,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी एका जखमी उपनिरीक्षकाच्या मुलीनेही आपली व्यथा मांडली. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील यापूर्वी भारतीय नौदलात मरीन कमांडो म्हणून 15 वर्षे कार्यरत होते. आंदोलनाच्या दिवशी ते बॅरिकेडजवळ तैनात होते. त्यांनी अनेकदा घरी सांगितले होते की, हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचे राहिले नसून काही असामाजिक घटक त्यात सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान जमावाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर मारहाण केली, ते चार तास घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत पडून होते आणि नंतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, असा दावा त्यांनी केला.
कुटुंबीयांनी यावेळी सोशल मीडियावर जखमी पोलिसांना आरोपी किंवा गुन्हेगार ठरवण्याच्या प्रवृत्तीवरही नाराजी व्यक्त केली. आपल्या कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलिसांबाबत संवेदनशीलता दाखवावी, अशी भावनिक विनंती त्यांनी केली. दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास सुरू असून, दगडफेक आणि पोलिसांवरील हल्ल्याबाबत संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
