ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारनं पाठवलेल्या अध्यादेशात त्रुटी दाखवली होती. त्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार टीका केली होती. मात्र, सुधारित अध्यादेश पाठवल्यानंतर अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो अध्यादेश आहे, हा पहिल्यांदा ज्या स्वरुपात पाठवला होता, त्या स्वरुपात मंजूर झाला असता तरी कोर्टाकडून त्यावर स्थगिती आली असती. राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं, त्यानंतर सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला होता.