आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या…
पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या दणदणाटावरून सुरू असलेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. DJविरोधात सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना TV9 मराठीशी संवाद साधत असताना कॅमेऱ्यासमोरच मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या दणदणाटावरून सुरू असलेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. DJविरोधात सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना TV9 मराठीशी संवाद साधत असताना कॅमेऱ्यासमोरच मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी DJवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात DJ समर्थक आणि DJविरोधकांमध्ये वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बापट हे TV9 मराठीशी संवाद साधत असताना अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “विद्यानंद बापट यांना मारहाण करणं ही निषेधार्ह घटना आहे. आम्ही या घटनेचा निषेध नोंदवत आहोत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक झालीच पाहिजे.” तसेच, मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या मागे कोणती यंत्रणा किंवा ताकद काम करत आहे, याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
माध्यमांशी बोलताना एखाद्या व्यक्तीवर हल्ला होणे योग्य नसल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केला. “कोण मारतं? कशासाठी मारत आहे? हिंमत कशी होते यांची? एखादी व्यक्ती शांततेने माध्यमांशी बोलत असेल तर लोकशाहीत तो त्याचा अधिकार आहे. ही गुंडागर्दी नाही तर काय आहे?” असा सवाल त्यांनी केला. मारहाण करणाऱ्याला अटक करून त्याच्या मागे कोण आहे, कोणती ताकद आहे, याचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली. पुण्यातील वाढत्या गुंडागर्दीवरूनही सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. “भाजपने गुंडागर्दी कधी कमी होणार हे सांगितलं पाहिजे. सत्तेत ते आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. एक व्यक्ती लोकशाही पद्धतीने बोलत असेल तर त्याला मारलं जातं आहे. हे सहन होणारं नाही,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे सांगताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री यांना फोन करणार असल्याचेही स्पष्ट केले. “एखाद्या व्यक्तीला मारण्याची हिंमत कशी होते? पाठीमागे मोठी ताकद असल्याशिवाय हे कोण करेल? महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राची बदनामी होतेय. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आवरा हे गुंड,” असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, गणेशोत्सवातील DJचा मुद्दा, ध्वनीप्रदूषण आणि त्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे पुण्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते आणि हल्ल्यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कसा पुढे जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.
