पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं. पण हे हत्यार देशाविरोधातच वापरलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला आहे, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढवला आहे. पार्लमेंट चेंबरमध्ये आज काँग्रेससह 14 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींसह या 14 पक्षांचे नेते मीडियाला सामोरे गेले. यावेळी राहुल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील सर्व विरोधक एकवटले आहेत.