राज ठाकरे आले… फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं…

राज ठाकरे आले… फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं…

| Updated on: Jul 01, 2026 | 2:07 PM

राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. ठाण्यातील सीकेपी सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधला.

राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. ठाण्यातील सीकेपी सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले की, देशातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण अत्यंत घाणेरडे असून अशा प्रकारच्या राजकारणाचे परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावे लागतील. कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला सत्ता कायमस्वरूपी मिळत नसते. आज घेतले जाणारे निर्णय आणि अवलंबली जाणारी राजकीय पद्धत भविष्यात कोणता पायंडा पाडेल, याचे भान राजकारण्यांनी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सध्या पक्षाची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर उभी आहे. “पत्त्यांच्या बंगल्याचा सर्वात खालचा पत्ता निघाला की संपूर्ण बंगला कोसळतो, त्याचप्रमाणे सध्या जे काही टिकून आहे ते मोदींमुळेच आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले. उद्या सत्ता बदलल्यानंतर भाजपलाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, इतिहासात ज्या-ज्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच पक्षांतून नवे विरोधक निर्माण झाले आणि त्यांनीच पुढे त्या सत्तेला आव्हान दिले. हीच प्रक्रिया आता भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आणीबाणीच्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी इतिहासातून धडा घेण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. विविध पक्षांतील नेत्यांना वेगळे करून स्वतंत्र गट निर्माण करण्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणे डोळ्यासमोर असल्याचा दावा त्यांनी केला. “समोरचे विरोधक संपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पक्षातच नवे विरोधक तयार होतात, हा जगाचा नियम आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून त्यांच्या टीकेला भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 01, 2026 2:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us