शिवसेनेला वाचवायचं असेल, तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडलं पाहिजे : रामदास आठवले

| Updated on: Sep 16, 2021 | 8:28 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बाहेर पडत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी फक्त मुंबईच्या बाहेर न पडता सरकारच्या बाहेर पडावं, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

Follow us on

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बाहेर पडत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी फक्त मुंबईच्या बाहेर न पडता सरकारच्या बाहेर पडावं. सरकारच्या बाहेर पडून त्यांनी भाजप आणि आरपीआयसोबत यावं. शिवसेना वाचवायची असेल तर त्यांनी आपल्या निर्णयात बदल करणं आवश्यक आहे. अडीच-अडीच फॉर्म्युलावर सेना-भाजप एकत्र येऊ शकतात”, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात काहीतरी मोठी राजकीय हालचाल घडण्याचे संकेत दिले आहेत. हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करणारं सरकार आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. तुम्ही एकत्र आला आहात तर तुम्ही शांतपणे राज्याचा कारभार करा. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. लोकांचे प्रश्न बाजूला राहिले आणि त्यांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्री मोदींकडे आहे. नरेंद्र मोदींवर काहीतरी आरोप करायचा आणि त्यातच आपलं समाधान मानतात. हे सरकार जावं आणि आमचं महायुतीचं सरकार यावं, असं रामदास आठवले म्हणाले.