मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (ravi rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने राजद्रोहाच्या कायद्यावर चर्चा सुरू झाली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजद्रोहाचा कायदा नसवा असं मत व्यक्त केलं आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही पवारांच्या सुरात सूर मिसळला आहे. हा कायदाच रद्द करून टाकावा असं पवारांनी सांगितलं आहे. ब्रिटिश काळातील हा कायदा आहे. आता जर राजकीय कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल केला जात असेल तर ते चुकीचं आहे, असं रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणू असं विधान राणा दाम्पत्यांनी केलं होतं. पण त्यांनी अशाप्रकारचं आंदोलन केलं नाही. माझ्या घरासमोरही आंदोलन झालं. शरद पवारांच्या घरासमोरही आंदोलन झालं. तेव्हा राजद्रोहाचा गुन्हा लावला. मला वाटतं असे गुन्हे लावणे चुकीचे आहे, असं दानवे यांनी स्पष्ट केलं.