Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय संघर्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यभरात पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात आंदोलन होत असून नागरिकांना लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय संघर्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यभरात पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात आंदोलन होत असून नागरिकांना लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
राऊत यांनी आपल्या पत्रात दावा केला आहे की, संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना धमकीची भाषा वापरत “माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढा. मी तुम्हाला स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवीन,” असे वक्तव्य केले. तसेच, “मी याआधी पाच लोकांना ठार केले आहे,” असा दावा केल्याचाही आरोप त्यांनी केला असून या वक्तव्याची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय दिना पाटील यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “मी कोणालाही मारलेले नाही. तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारत आहात. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत,” असे म्हटले.
पुढे स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, “यापूर्वी काही लोकांना भडकावून आंदोलनासाठी पाठवण्यात आले होते. त्या घटनेदरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला होता. तशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, एवढाच माझ्या वक्तव्याचा उद्देश होता. मी स्वतः कुणालाही मारलेले नाही.”
तसेच, “ज्या घटनेचा संदर्भ दिला जात आहे, ती घटना माझ्या जन्माआधीची आहे. मग मी कोणाला कसे मारू शकतो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला असून, आरोप आणि प्रत्यारोपांच्या या मालिकेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता या प्रकरणावर पुढे कोणती राजकीय आणि कायदेशीर घडामोड होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
