Sanjay Raut : उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, ‘नरकातला स्वर्ग’मधून राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
Sanjay Raut Book Narkatla Swarga : खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे करण्यात आलेले आहे. उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे. प्रकाशनपूर्वीच या पुस्तकावरून आता वादंग निर्माण झालं आहे. राऊतांनी आपल्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भात हे पुस्तक लिहिलेलं आहे. राऊत यांनी या पुस्तकातून केलेल्या गौप्यस्फोटांमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यात राऊत यांनी लिहिलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशात यूपीएचं सरकार होतं. गोध्रा हत्याकांडदरम्यान सीबीआयसह अनेक चौकश्यांचा ससेमिरा सुरू होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता. याचदरम्यान गुजरातच्या अनेक तत्कालीन मंत्र्यांना आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांना तुरुंगात टाकलं होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता. अटकेची टांगती तलवार होती. मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाही असं मत शरद पवारांचं होतं. पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मुक संमती दिली होती. त्यामुळेच मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचं स्मरण किती ठेवलं? असा सवाल यातून राऊत यांनी केला आहे.
