Kolhapur Panchaganga Pollution | पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; तेरवाड बंधाऱ्याजवळ जलपर्णीची वाढ, नागरिकांमध्ये संताप
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी सध्या पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली प्रदूषणाची समस्या अद्यापही कायम असून नदीची अवस्था चिंताजनक बनली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी सध्या पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली प्रदूषणाची समस्या अद्यापही कायम असून नदीची अवस्था चिंताजनक बनली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्र पूर्णपणे जलपर्णीने झाकले गेले असून ते एखाद्या मैदानासारखे दिसत आहे. या जलपर्णीवर पक्षी सहजपणे फिरताना दिसत असल्याने नदीतील प्रदूषणाची गंभीरता स्पष्ट होत आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीतील प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांच्या संतापातही वाढ होताना दिसत आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण तातडीने रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
