Sanjay Raut | राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतांश राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडण्यात आली होती. विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतांश राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडण्यात आली होती. विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला राज्यसभेची एकच जागा मिळते आणि तीही सर्व पक्ष एकत्र राहिल्यास शक्य होते, असे राऊत यांनी सांगितले. काल झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी, ही भूमिका योग्यच होती. तथापि, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 आमदार असल्याच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निर्णय घेत शरद पवार यांनीच राज्यसभेवर जावे, असा एकमताने निर्णय घेतला. शरद पवार यांचे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान असल्यामुळेच ही जागा त्यांच्यासाठी तिन्ही पक्षांनी मिळून जाहीर केली आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
