कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, “या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले”.