सोलापूर : कर्नाटककडून होणारी पाणी चोरी आणि शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सोलापुरात ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर महापालिकेविरोधात अनोख्या पद्धतीने निदर्शने करण्यात आली आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने प्रतिकात्मक ‘बिरबलाची खिचडी’ करत ठाकरेगटाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. पाण्याच्या हंडीला विविध प्रकारचे फलक लावत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. “जनता त्रस्त प्रशासन मस्त”, “धरण उशाला कोरड घशाला”, “पाणी पळविण्याचा कर्नाटकी डाव; प्रशासन आणतंय झोपेचा आव” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.