23 तारखेच्या रात्री सोमय्या खार पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. आणि बाहेर पडताच सोमय्यांच्या गाडीवर दगड, बाटल्या आणि चप्पलांनी हल्ला झाला. एक दगड सोमय्या बसलेल्या काचेला लागला. जी दृश्यं टीव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सोमय्यांवर हल्ला झाला, याबद्दल पोलिसांमध्ये दुमत नाही.मात्र त्यानंतर जी जखम सोमय्यांनी माध्यमांना दाखवली. ती नेमकी खरी आहे की मग खोटी, याची सत्यता मुंबई पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे. जेव्हा दगडामुळे गाडीची काच फुटली, तेव्हा ती काच सोमय्यांच्या चेहऱ्यावर उडून ते जखमी झाल्याचं सांगितलं जातंय.
मात्र सोमय्यांच्या जखमेवर मुंबई पोलिसांना शंका येण्यामागे २ कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे जेव्हा पहिला दगड सोमय्यांच्या गाडीवर मारला गेला, तेव्हा सोमय्यांच्या गाडीची काच पूर्णपणे तुटली नव्हती. मात्र जेव्हा सोमय्या वांद्र पोली स्टेशनमध्ये पोहोचले, तेव्हा गाडीच्या काचेचा पूर्ण चुराडा झाला होता. म्हणून मधल्या रस्त्यांवरही सोमय्यांवर हल्ला झाला का, याचा शोध पोलीस घेतायत. आणि दुसरं कारण म्हणजे हल्ल्याच्या रात्री जी जखम सोमय्यांच्या चेहऱ्यावर दिसली. ज्यातून रक्त वाहत होतं, त्या जखमेचा व्रण सकाळच्या पत्रकार परिषदेवेळी का नव्हता, अशी शंका पोलिसांना आहे.काल यासंदर्भात पत्रकारांनी सोमय्यांना त्यांना विचारणा केली होती. तेव्हा मात्र जखमेऐवजी हल्ला झाला हा महत्वाचा मुद्दा असल्याचं सोमय्यांनी म्हटलं.