कालच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या मुद्द्यावर बोलले, औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर बोलले..भाजपवर सडकून टीका केली, काश्मीरच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. पण औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमबद्दल त्यांनी चकार शब्दही काढला नाही. मागच्याच महिन्यात एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादजवळच्या खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली..त्या औरंगजेबाच्या समाधीचं एमआयएम नेत्यांनी वाकून दर्शन घेतलं. त्याबद्दल उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत, याआधी मुंबईतल्या बीकेसीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी ओवैसींवर टीका केली होती आणि एमआयएम ही भाजपचीच दुसरी टीम असल्याचा आरोप केला होता. पण काल औरंगाबादेत येऊनही. ठाकरेंनी याबद्दल भाष्य करणं टाळलं. काल ठाकरेंच्या सभेआधी इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला केला. औरंगाबादच्या नामांतरणावरुन चिमटाही काढला.