मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन मविआ आक्रमक झाली आहे. त्यावरूनच आता मविआ विरुद्ध भाजप-शिंदे गटात वार प्रहार होताना दिसत आहेत. तर यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आता फक्त पोपट मेल्याचं काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी करायचं आहे असं म्हटलं होतं. तर त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना पोपट मेला असं कुणी सांगतच नाहीय. शिवसेना ही शिल्लक सेना आहे, असे टीकास्त्र सोडलं होतं. तसेच राजीनामा नाट्य टीआरपीसाठी होते असं म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावरून आता मविआ-भाजपत पोपटावरुन सामना सुरु असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील आता पोपटावरुन टीका केली आहे. पोपट मेला नाही, मैना मेली नाही, मोर मेला नाही. सगळे जिवंत आहे. कोण कुठं मेलय दाखवा असं म्हणत अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला लगवला आहे.