Supriya Sule : शेतकऱ्यांच्या निराधार मुलांचे पैसे शासनाने अडवून ठेवले; सुळेंच्या ट्विटची चर्चा
Bal Sangopan Yojana delay : शासनाकडून निराधार मुलांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेचं वितरण गेल्या 15 महिन्यांपासून झालेलं नाही, अशा आशयाचं एक ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे.
शेतकऱ्यांच्या निराधार मुलांना गेल्या 15 महिन्यांपासून मदत मिळालेली नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे. शासनाने पैसे अडवून ठेवले ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याचं देखील सुळे यांनी म्हंटलं आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक ट्विट शेअर केलं आहे. या निराधार मुलांना तातडीने मदतीची रक्कम दिली जावी अशी मागणी त्यांनी यात केली आहे.
या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे की, ”शासनाच्या बालसंगोपन योजनेखाली निराधार आणि निराश्रित बालकांना शासनातर्फे ठरावीक रक्कम दिली जाते. या योजनेत शेतकरी आत्महत्येमुळे निराधार झालेल्या मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना 15 महिन्यांपासून मदतीची रक्कम मिळाली नाही, अशी तक्रार येत आहे. यात अमरावतीमधील मुलांचा देखील समावेश आहे. या निराधार मुलांचे पैसे शासनाने अडवून ठेवले ही अतिशय खेदाची बाब आहे. याच रकमएतुण त्यांचं भरणपोषण होतं त्यामुळे त्यांना ही मदतीची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी.”
