मुंबई: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीत सभा घेतली. या सभेमध्ये रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या. रिफायनरी प्रकल्प करून दाखवतो. कोण आडवं येते ते पाहू अशी भाषा गृहमंत्र्यांनी वापरली. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकार शशिकांत वारिसेंची हत्या झाली. 24 तास आधी गृहमंत्री म्हणतात रिफायनरीला कोण आडवा येतो ते पाहू. दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा पत्रकार मारला जातो. याचे काय संबंध लावायचे? हा योगायोग समजायचा का? की अजून काय समजायचे? असा सवाल ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता विरोधकांच्या हत्या घडवून आणल्या जात आहे. ही झुंडशाही आणि गुंडशाही आहे. आतापर्यंत अटकेत असलेल्या आरोपीने किती हल्ले केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केल्या हे गृहमंत्र्यांना माहीत आहे. हत्येमागच्या सूत्रधाराला अटक केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.