भिवंडी ठाणे जुन्या मार्गावर खड्ड्यां मुळे वाहतूक कोंडी , खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ट्रक झाला पलटी , कशेळी ते अंजुरफाटा दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर तुफान वाहतूक कोंडी झाली आहे. तर, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी एमएसआरडीसीची असल्याने त्यांनी तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी, जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच या मार्गावरील अवजड वाहतूकही रस्ते दुरुस्ती होईपर्यंत थांबवावी. येत्या आठ दिवसात याबाबत भूमिका न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.