मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी राऊत यांनी ठाणे कुणाची मालमत्ता नाही असं म्हणत शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांना सुनावलं आहे. तर कोल्हापुरातील एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचले असे म्हणत खासदार धैर्यशील माने यांच्यावर निशाना साधला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. भलेही इलेक्शन कमिशनने कागदावरती काही मजकूर कोरून करून दिला असेल. पण जनतेच्या मनात राग आहे. त्यामुळेच इचलकरंजीमध्ये एक खासदार, गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचले. जनतेने त्यांची गाडी अडवली, त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या अंगावर जनता गेली. मला तर वाटत होतं की जनता त्यांना आता मारते की काय? संताप आणि चिड लोकांच्या मनामध्ये आहे.