नाशिक, २८ नोव्हेंबर २०२३ : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळीपावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने थैमान घालत शेतात काढून ठेवलेला आणि काढणीला आलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भाताबरोबरच नागली, वरई, उडीद, खुरसणी, भुईमूग, तुर, सोयाबीन या काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर बोरगाव घाटमाथ्यावर स्ट्राबेरी, टमाटे, घेवडा, कांदा पिकेही वाया गेली. आंबा पिकांचा मोहर झडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून आसमानी संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाला शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.