अकोला, २७ नोव्हेंबर २०२३ : अकोला जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता, त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला आहे. अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, गहू, कपाशी आणि भाजीपाला इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातुर या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास मात्र या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र राज्यात आहे. दरम्यान, अवकाळी पावसानं बळीराजाला आर्थिक संकटात पाडलं आहे. यावर आता सरकार काही मदत देतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.