सांगली : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या ( MAHARASHTRA KESARI ) सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कुस्तीपटू पैलवान सिकंदर शेख ( SIKANDAR SHAIKH ) याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र, पंचानी दिलेला निर्णय चुकीचा ठरवत सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
सिकंदर शेख यानेही मुलाखतीदरम्यान झालं गेलं विसरून जाऊ आणि एक दिवस माझ्या चाहत्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी आनंदाश्रू दिसतील असे सांगितले होते. त्यांनतर दुसऱ्याच आठवड्यात सिकंदर शेख याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सांगली येथे विसापूर केसरीचं मैदान सिकंदर शेखने मारलं आहे. मोळी डावात त्याने पंजाबच्या पहिलवानाला अवघ्या दहा मिनिटात चितपट केलंय. महाराष्ट्र केसरीचा वाद सुरु असतानाच आता सिकंदरने हे मैदान मारून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.