सोयाबीनच्या दरवाढीत बियाणे कंपनीचाही वाटा, अकोल्यात सर्वाधिक दर

| Updated on: Nov 23, 2021 | 12:39 PM

सोयाबीन दरवाढीबाबत सर्वकाही सकारात्मक घडत आहे. एकीकडे प्रक्रिया उद्योजकांकडून सोयाबीनला मागणी वाढत असताना आता यामध्ये अणखीन भर पडली आहे ती बियाणे कंपन्याची. यामुळे सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी वाढ ही सुरुच आहे. मध्यंतरी सोयाबीनचे दर हे 4 हजार 800 वर येऊन ठेपले होते.

सोयाबीनच्या दरवाढीत बियाणे कंपनीचाही वाटा, अकोल्यात सर्वाधिक दर
सोयाबीनचे संग्रहीत छायाचित्र
Follow us on

अकोला : सोयाबीन दरवाढीबाबत सर्वकाही सकारात्मक घडत आहे. एकीकडे प्रक्रिया उद्योजकांकडून सोयाबीनला मागणी वाढत असताना आता यामध्ये अणखीन भर पडली आहे ती बियाणे कंपन्याची. यामुळे सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी वाढ ही सुरुच आहे. मध्यंतरी सोयाबीनचे दर हे 4 हजार 800 वर येऊन ठेपले होते. मात्र, गेल्या महिन्याभरात यामध्ये तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तर भविष्यातह दर वाढतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

हंगामाच्या सुरवातील सोयाबीनचे दरात कमालीची घट झाली होती. त्यामुळे सोयाबीनच्या दराला घेऊन चिंता व्यक्त केली जात होती. यातच केंद्र सरकारने सोयापेंडची आयात केल्याने सोयाबीन दराचे भवितव्य अंधारातच असेच होते. मात्र, दिवाळीनंतर चित्र हे बदलत आहे. सोयापेंड आणि सोयाबीनच्या दरात अधिकची तफावत नसल्याने उद्योजक आता स्थानिक सोयाबीन खरेदीलाच अधिकची पसंती देत आहेत. त्यामुळे सोयापेंडच्या आयातीचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झालाच नाही.

राज्यातील मुख्य बाजारपेठेत सोयाबीनचे दर

सबंध राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 6 हजाराचा टप्पा पार केलेला आहे. शिवाय दिवसाकाठी होत असलेली वाढ ही वेगळीच. अकोला आणि लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 6 हजार 800 चा दर सोयाबीनला मिळालेला आहे. पोटलीत हे दर वेगळे असले तरी सौद्यांमध्ये हाच दर मिळालेला आहे. वाशिम बाजार समितीमध्ये 6700, खामगांव बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला 6400 चा दर मिळाला आहे. मागणी कायम राहिली तर दरात वाढ होणारच असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

बियाणे कंपन्यांकडूनही मागणी तेजीत

आता आगामी खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. एकीकडे महाबिज हे बीजोत्पादनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. उन्हाळी सोयाबीनची पेरणी करुन खरीप हंगामातील बियाणे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. तर दुसरीकडे बियाणे कंपन्याही सोयाबीनची खरेदी करु लागल्या आहेत. बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विक्री केले जाणारे सोयाबीन कंपन्यांकडून सध्या विविध बाजारात खरेदी केले जात आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये मध्यप्रदेशातील खरेदीदार स्थानिक पातळीवर सोयाबीनची खरेदी करीत आहेत.

सोयाबीनची साठवणूक गरजेची

सोयाबीनच्या दरात वाढ होत असली तरी अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची एकदम विक्री न करता गरजेनुसारच विक्री करणे गरजेचे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. त्यामुळेच दरामध्ये वाढ होत आहे. असाच संयम शेतकऱ्यांनी कायम ठेवला तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आता तर बियाणांसाठीही सोयाबीनची मागणी होत आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अभ्यास करुनच केलेली विक्री शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे.

संबंधित बातम्या :

तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांना जायकवाडी धरणातील पाणी, प्रथमच शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय

थकीत ‘एफआरपी’चा गुंता आता उच्च न्यायालयात, लोकवर्गणीतून उभारला जाणार लढा