नगरमध्ये लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला, दोघांच्या चिंधड्या
अहमदनगरमधील लष्कराच्या के के रेंज हद्दीमध्ये स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. नगर एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के के रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमाराला हा भीषण स्फोट झाला.
अहमदनगर : अहमदनगरमधील लष्कराच्या के के रेंज हद्दीमध्ये स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. नगर एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के के रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमाराला हा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे भंगार गोळा करण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने हा स्फोट झाला. दोघेही मृत खारे कर्जुने गावचे रहिवासी होते. भीषण स्फोटाने त्यांच्या शरिराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
अक्षय नवनाथ गायकवाड वय 19 आणि संदीप भाऊसाहेब तिरवडे वय 32 अशी मृतांची नावे आहेत. रात्री साडे अकराच्या सुमारास ही भीषण घडल्याचं सांगण्यात येत आहे. हे दोघे जण लष्कराच्या के के रेंज हद्दीमध्ये भंगार गोळा करण्यासाठी गेल्याचा संशय आहे.
के के रेंज परिसर हा लष्कराचा संवेदनशील भाग आहे. इथे जवानांचा युद्धाचा सराव चालतो. दरवर्षी इथे जवानांचा सराव सुरु असतो. मोठमोठे रणगाडे, तोफा, बॉम्बस्फोटांचा मारा केला जातो. या सरावानंतर फुटलेले बॉम्ब, गोळ्यांची आवरणे, निकामी शस्त्र किंवा तत्सम भंगार गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिक या लष्कराच्या हद्दीत घुसतात. तसाच प्रकार करणं हे जीवावर बेतलं. भंगार गोळा करत असताना तिथे एक जिवंत बॉम्ब होता. तो अचानक फुटल्याने दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या स्फोटामुळे त्यांच्या शरिराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या.
दरम्यान, भंगारवाल्यांना जिवंत बॉम्ब सापडतोच कसा आणि त्याचा स्फोट होतोच कसा? जिवंत बॉम्ब जमिनीवर सापडणं हा निष्काळजीपणा नाही का, असाही प्रश्न आहे.