Goa Assembly Elections 2022 : गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची युती; उदय सामंतांची माहिती, भाजपवर आरोपांच्या फैरी
गोवा विधानसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार असल्याची चर्चा यापूर्वीच सुरू होती. फक्त त्यावर अधिकृत घोषणा होणे बाकी होते.
पणजीः सुंदर, देशविदेशातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या इवल्याशा गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) रंगत आली असून, या ठिकाणी शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसची युती झाल्याची माहिती मंगळवारी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी गोव्यात ठोकलेला तळ आणि त्यामुळे सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आजही पाहायला मिळाल्या. सामंत यांनी यावेळी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
काय म्हणाले सामंत?
गोवा विधानसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार असल्याची चर्चा यापूर्वीच सुरू होती. फक्त त्यावर अधिकृत घोषणा होणे बाकी होते. मात्र, सामंत यांनी ही युती झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती झाली आहे. गोव्यातील नागरिकांना आता एक सक्षम पर्याय हवा आहे. तो आम्ही देणार आहोत. गोव्यातील जनतेला राजकारण समजत आहे. येथे नक्कीच परिवर्तन होणार आहे. तसा निर्धार गोवेकरांनी केला आहे. भाजपने पर्रिकरांचा अपमान केला आहे. ज्याने भाजपला मोठे केले त्यांना डावलण्याचे काम केले करण्यात आले आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
याद्या झाल्या जाहीर
दरम्यान, गोवा विधानसभेसाठी नुकतीच शिवसेनेने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आरएसएसमधून भाजपमध्ये आलेले शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना शिवसेना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना गोव्यात 12 जागांवर लढणार आहे. त्या – त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील. विधानसभेत शिवसेनेचे आमदार जातील, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
पर्रिकरांना तिकीट नाही
भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. उत्पल यांनी ज्या पणजी विधानसभेचा आग्रह धरला होता, त्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.
इतर बातम्याः
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना