या मालिकेत होते 1000 हून अधिक कलाकार, एका व्यक्तीने बदलला TV चा चेहरा, TRP ने मोडलेले अनेक रेकॉर्ड
या टीव्ही मालिकेतून पहिल्याच 350 कलाकारांनी केलं इंडस्ट्रीमध्ये पदार्पण. मालिकेत 1000 हून अधिक होते कलाकार. TRP ने मोडलेले सर्व रेकॉर्ड.

Tv Show : 1988 साली दूरदर्शनवर सुरू झालेल्या एका ऐतिहासिक मालिकेने भारतीय प्रेक्षकांना आपल्या देशाच्या समृद्ध इतिहासाशी नव्याने जोडले. ही गाजलेली मालिका म्हणजे ‘भारत एक खोज’. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ही मालिका साकारली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘The Discovery of India’ या सुप्रसिद्ध पुस्तकावर ही मालिका आधारित होती.
या मालिकेची कल्पना त्या काळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ऐतिहासिक मालिकांप्रमाणेच भारताच्या खऱ्या इतिहासावर आधारित मालिका तयार व्हावी असा त्यांचा विचार होता. श्याम बेनेगल यांनी ही कल्पना लगेच स्वीकारली आणि त्यानंतर सखोल संशोधन व नियोजनाला सुरुवात झाली.
या मालिकेच्या निर्मितीत सुमारे 25 लेखक आणि 35 इतिहासकारांचा सहभाग होता. प्रत्येक भाग ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि तथ्याधारित असावा, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. या मालिकेचे लेखन शमा जैदी यांच्या नेतृत्वाखाली झाले. संपूर्ण मालिका तयार करण्यासाठी तब्बल 11 महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लागला.
मालिकेत 1000 हून अधिक कलाकार
‘भारत एक खोज’ या मालिकेत एकूण 53 भाग होते, मात्र तिचा प्रभाव अत्यंत व्यापक होता. या मालिकेत 1000 हून अधिक कलाकार सहभागी झाले होते, त्यापैकी सुमारे 350 कलाकारांना या मालिकेमुळे पहिल्यांदाच अभिनयाची संधी मिळाली.
या मालिकेत रोशन सेठ यांनी पंडित नेहरू यांची भूमिका साकारली आणि तेच मालिकेचे सूत्रधारही होते. ओम पुरी यांनी सम्राट अशोक, औरंगजेब आणि दुर्योधन यांसारख्या विविध भूमिका साकारल्या. तसेच सलीम घोष यांनीही अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या. या मालिकेत नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी, शबाना आजमी, पल्लवी जोशी, पीयूष मिश्रा आणि इरफान खान यांसारखे दिग्गज कलाकार झळकले.
दर रविवारी प्रसारित व्हायची मालिका
या मालिकेचे चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटी गोरेगाव येथे करण्यात आले होते. यासाठी एक वर्षासाठी दोन फ्लोअर्स आरक्षित करण्यात आले होते. तसेच देशातील विविध ऐतिहासिक ठिकाणीही शूटिंग करण्यात आले, ज्यामध्ये ताज महल आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे.
ही मालिका दर रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केली जात होती आणि त्या वेळी संपूर्ण देशभरातील लोक टीव्हीसमोर बसत असत. या मालिकेने भारताच्या सुमारे 5000 वर्षांच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण केले आणि ‘अनेकतेत एकता’ हा संदेशही प्रभावीपणे पोहोचवला.
