कार्तिक आर्यन-ममूटींचा दुहेरी विजय, यामी गौतमचीही मोठी झेप, पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.

72nd National Film Awards: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी संध्याकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीने विशेष छाप पाडली आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि ममुट्टी यांची संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली असून, यामी गौतम हिला ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
हे पुरस्कार 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी देण्यात आले आहेत. विविध भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक आणि तांत्रिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव या पुरस्कारांद्वारे करण्यात आला आहे.
कार्तिक आर्यन आणि ममुट्टी यांचा दुहेरी सन्मान
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन याला ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ममुट्टी यांनाही ‘ब्रमायुगम’ या चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी याच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार संयुक्तपणे दोन कलाकारांना मिळाला आहे.
यामी गौतम ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील प्रभावी आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या पुरस्कारामुळे तिच्या अभिनयाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
‘श्रीकांत’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
अभिनेता राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘श्रीकांत’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रेरणादायी कथानक आणि प्रभावी सादरीकरणामुळे या चित्रपटाला हा सन्मान मिळाला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होताच चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजेत्या कलाकारांवर आणि चित्रपटांच्या संपूर्ण टीमवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जात असल्याने या पुरस्कारांना विशेष प्रतिष्ठा आहे.
