
दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे ‘थप्पड’, ‘रावन’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांनी करिअरमध्ये असेही काही चित्रपट बनवले आहेत, ज्यांची खंत त्यांना आजही आहे. अनुभव यांच्या मते त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट अजय देवगणसोबत बनवला होता. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव ‘कॅश’ असं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतक्या दणक्यात आपटला की त्यानंतर अजय आणि अनुभव यांच्यात दुरावा निर्माण झाला. एका मुलाखतीत खुद्द अनुभव यांनी याविषयीचा खुलासा केला होता. गेल्या 18 वर्षांपासून अजय माझ्याशी बोललाच नाही, असं त्यांनी सांगितलं.
‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनुभव म्हणाले, “अजय देवगण हा माणूस म्हणून खूप चांगला आहे. परंतु जेव्हा चित्रपट चालत नाहीत, तेव्हा टीम वेगळे होतात. मी माझ्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट अजयसोबत केला होता. आम्ही कधीच भांडलो नाही. पण तो माझ्याशी बोलत नाही आणि त्यामागील कारण मला माहीत नाही.” ‘कॅश’ या चित्रपटात अजय देवगणसोबतच सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, जाएद खान, शमिता शेट्टी, आयेशा टाकिया आणि दिया मिर्झा अशी मोठी स्टारकास्ट होती. केपटाऊन आणि दक्षिण आफ्रिकेत या चित्रपटाचा बहुतांश भाग शूट झाला होता. दिसायला हा चित्रपट जरी स्टायलिश वाटत असला तरी कमकुवत कथेमुळे तो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. याच कारणामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
“कॅश या चित्रपटानंतर आम्ही भेटलोसुद्धा नाही. त्यामुळे तो मला जाणूनबुजून दुर्लक्ष करतोय, असंही मी तुम्हाला सांगू शकत नाही. कदाचित हे माझे अतिविचार असतील. पण मी त्याला मेसेज केले होते. त्याच्याकडून माझ्या मेसेजला रिप्लाय कधीच मिळाला नाही. त्यामुळे कदाचित त्याने मेसेज पाहिले नसावेत, अशी मी स्वत:ची समजून काढतोय. पण गेल्या 18 वर्षांपासून आमच्यात अजिबात संवाद झाला नाही,” असं अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केलं. सध्या अनुभव सिन्हा यांचा ‘अस्सी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने त्यांची ही जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.