हे रोमँटिक गाणं गाण्यासाठी कोणताही गायक नव्हता तयार, शेवटी या गायिकेने गायलं अन् झालं सुपरहिट
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील असं एक गाणं, जे गाण्यासाठी प्रत्येक गायकाने दिलेला नकार. पण शेवटी ज्याने गायलं त्याने घेतलं होतं पाच पट अधिक मानधन. गाणं ठरलं सुपरहिट. आजही ऐकतात लोक.

1960 चं दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ. त्या काळात अनेक गाजलेली गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. मात्र काही गाण्यांमागे असे किस्से दडलेले आहेत, जे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक रंजक किस्सा आहे 1964 साली प्रदर्शित झालेल्या ‘राजकुमार’ या चित्रपटातील एका गाण्याचा. हे गाणं इतकं बोल्ड मानलं गेलं की त्या काळातील अनेक नामांकित गायिकांनी ते गाण्यासाठी नकार दिला होता.
शम्मी कपूर आणि साधना यांच्यावर चित्रित झालेलं ‘दिलरुबा दिल पे तू ये सितम’ हे गाणं त्या काळात प्रचंड चर्चेत आलं होतं. या गाण्याला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार जोडी ‘शंकर-जयकिशन’ यांनी. त्या काळात शंकर-जयकिशन यांची गाणी म्हणजे हिटची हमी मानली जायची. त्यामुळे या गाण्यासाठीही त्यांनी सर्वप्रथम आपली आवडती गायिका लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र गाण्याचे शब्द आणि त्यातील कामुक अंदाज पाहून लतादीदींनी हे गाणं गाण्यास स्पष्ट नकार दिला. मी अशी गाणी गात नाही, असं सांगत त्यांनी हे गाणं टाळलं.
अनेक गायकांनी गाण्याला दिलेला नकार
यानंतर शंकर-जयकिशन यांनी सुमन कल्याणपूर यांच्याकडे धाव घेतली. त्या काळात सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांची जोडी खूप लोकप्रिय होती. त्यामुळे सुमन हे गाणं सहज गातील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांनीसुद्धा हे गाणं गाण्यास नकार दिला आणि संगीतकारांची अडचण आणखी वाढली.
शेवटी त्यांच्याकडे एकच पर्याय उरला होता आशा भोसले. पण त्यांना या गाण्याबाबत आधीच माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी गाणं गाण्यास होकार दिला, पण एक अट ठेवली. त्यांनी सांगितलं की, या गाण्यासाठी त्या लता मंगेशकर यांच्या मानधनापेक्षा पाचपट अधिक पैसे घेतील.
आशा भोसलेंचा होकार मिळताच गाणं ठरलं सुपरहिट
आशा भोसले यांच्या या मागणीने शंकर-जयकिशन अक्षरशः थक्क झाले. त्या काळात चित्रपटांचे बजेट मर्यादित असायचे. संगीतकार स्वतः मोठं मानधन घेत असले तरी एका गाण्यासाठी इतका खर्च करणे निर्मात्यांना अवघड जात होतं. त्यामुळे त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक K. Shankar यांच्याशी चर्चा केली. त्यांनाही आशाताईंची मागणी अनपेक्षित वाटली.
इतकंच नाही तर शम्मी कपूर यांनी निर्मात्यांना एक मार्गही सुचवला. “आशा भोसले जितके पैसे मागत आहेत, तितके त्यांना द्या. गरज पडली तर माझ्या मानधनातून कमी करा,” असं त्यांनी सांगितलं. शम्मी कपूर यांच्या या भूमिकेमुळे अखेर प्रश्न सुटला. यानंतर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी “Dilruba Dil Pe Tu” हे गाणं रेकॉर्ड केलं आणि पुढे ते सुपरहिट ठरलं.
