शाहरुखचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला, धुरंधर 2 ची 10 व्या दिवशी कमाई पाहून सर्वच थक्क
गेल्या 10 दिवसांपासून रणवीर सिंहच्या धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या दोन्ही सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Dhurandhar 2 Collection Day 10 : ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने इतिहास रचत असून प्रेक्षकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशीही या चित्रपटाने जोरदार कमाई करत आपली गती कायम ठेवली आहे. सॅकनिल्कच्या प्राथमिक अहवालानुसार, दहाव्या दिवशी चित्रपटाने सुमारे 38.18 कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण भारतातील कलेक्शन 754.10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर ग्रॉस कलेक्शनने 900 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी देखील चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये वाढता उत्साह स्पष्ट दिसून येत आहे. रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने शोची संख्या कमी असूनही दमदार कामगिरी केली. दहाव्या दिवशी चित्रपटाने एकूण सुमारे 62.85 कोटी रुपयांची कमाई केली. त्यापैकी हिंदी व्हर्जनने सर्वाधिक 35.70 कोटी रुपयांची कमाई केली. तर तमिळ आणि तेलुगू व्हर्जनने अनुक्रमे 0.88 कोटी आणि 1.60 कोटी रुपयांची कमाई केली. नवव्या दिवशी 41.75 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईचा वेग आणखी वाढत असल्याचे दिसत आहे. ट्रेड एक्स्पर्ट्सच्या मते, हा चित्रपट लवकरच 800 कोटींचा आकडा पार करू शकतो.
या चित्रपटाने पुष्पा 2 च्याही कमाईला मागे टाकले आहे. ‘पुष्पा 2’ ने दहाव्या दिवशी हिंदी भाषेत 46 कोटींची कमाई केली होती, तर ‘धुरंधर 2’ ने 62 कोटींचा टप्पा पार करत अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकले आहे. जगभरात या चित्रपटाने दमदार कामगिरी करत 10 दिवसांमध्ये 1200 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे आणि दुसऱ्या वीकेंडनंतर तो 1400 कोटींवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोठ्या चित्रपटांना टाकले मागे
आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने ‘पठान’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले असून जवानच्या विक्रमांच्या जवळ पोहोचला आहे. तसेच, या चित्रपटाचा वेग RRR आणि KGF: Chapter 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटात रणवीर सिंहसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर माधवन सारखे दिग्गज कलाकार दिसत असून त्यांच्या अभिनयामुळे चित्रपट अधिक भव्य आणि प्रभावी ठरला आहे.
