घटस्फोटानंतर मुलीचं बँडबाजाने धूमधडाक्यात स्वागत; ‘धुरंधर’मधल्या जमील जमालीचा व्हिडीओ चर्चेत
'धुरंधर' फेम अभिनेते राकेश बेदी यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते घटस्फोटाविषयी बोलताना दिसत आहेत. घटस्फोट म्हणजे शेवट नाही, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय.

ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. करिअरमध्ये पुन्हा एकदा ते स्टारडमचा अनुभव घेत आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी जमील जमालीची दमदार भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता ते त्यांच्या रुटीनमध्ये परतले आहेत. पण त्याचसोबत ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हैदराबादमध्ये आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत असल्याची माहिती ते या व्हिडीओद्वारे चाहत्यांना देत आहेत. एकीकडे सतत ईराण- अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या बातम्या समोर येत असताना देशातल्या एका दुसऱ्या वृत्ताने खुश केल्याचं त्यांनी म्हटलंय. हे वृत्त एका घटस्फोटीत मुलीचं पुन्हा माहेरी वडिलांकडून जोरदार स्वागत केल्याचं होतं.
या व्हिडीओमध्ये राकेश बेदी म्हणाले, “गेल्या काही काळापासून सतत हंगामाच्या बातम्या समोर येत आहेत. ईराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे, आयपीएल सुरू आहे. परंतु यादरम्यान एका बातमीने मला खुश केलं. ही बातमी मला खूप आवडली. उत्तर प्रदेशात एक मुलगी घटस्फोटानंतर तिच्या माहेरी परतली, तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं बँडबाजा वाजवून, मिठाई वाटून, लोकांना एकत्र जमा करून धूमधडाक्यात आनंद साजरा केला, मुलीचं स्वागत केलं. ही कमालीची बाब आहे. सर्वांसाठी हा एक धडा आहे. जर आपल्या देशात कोणत्याही मुलीचा घटस्फोट होत असेल, तर याचा अर्थ असा नाही की तिचं आयुष्य संपलं आहे. याचा अर्थ असा आहे की तिची साथ द्या, तिला पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी मदत करा.”
राकेश बेदी यांनी उत्तर प्रदेशातील त्या मुलीला आणि तिच्या पित्याला सलाम केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘घटस्फोट म्हणजे अंत नाही, त्याला नवीन सुरुवात बनवा.’ त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शविली आहे. ‘खूप सुंदर संदेश सर, ऐकून खूप छान वाटलं’, असं एकाने लिहिलं. तर ‘सर्वांनी तुमच्यासारखा विचार करायला हवा’, असं दुसऱ्याने म्हटलंय.