Womens T20 World Cup: भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा धक्का, कर्णधार खेळणार की नाही? सस्पेंस वाढला
IND vs PAK, ICC Womens T20 World Cup 2026: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना 14 जून रोजी बर्मिंघमच्या मैदानात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर आहे.

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा रंग आता प्रत्येक सामन्यानंतर वाढत चालला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेतील पहिला सामना 14 जून रोजी खेळणार आहे. हा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सुरूवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी दुपारी पाकिस्तान संघाच्या सराव शिबिरात एक विचित्र अपघात घडला. नेट्स प्रॅक्टिस गोलंदाजी करणारी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना गंभीररित्या जखमी झाली आहे. त्यामुळे हायव्होल्टेज सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न आता पाकिस्तानी क्रीडाप्रेमींना पडला आहे. कर्णधाराच्या फिटनेसबाबत पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
फातिमासोबत नेमकं काय घडलं?
वुमन्स टी20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ सराव करत असताना फातिमा गोलंदाजी करत होती. तेव्हा समोर फलंदाजी करणाऱ्या आयशा जफरने जोरात सरळ फटका मारला. हा फटका इतका जोरात होता की फातिमाला स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. चेंडू थेट तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला लागला. त्यामुळे फातिमा वेदनेने कळवली आणि जागेवरच बसली. तिची स्थिती पाहून सपोर्ट स्टाफने तात्काळ तिच्या दिशेने धाव घेतली. फातिमाची वेदना पाहून तिला तात्काळ मैदानातून बाहेर घेऊन गेले. त्यानंतर ती सरावासाठी मैदानात उतरली नाही. आता भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
भारत पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तान हे संघ 14 जून 2026 रोजी आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक 6.30 वाजता होणार आहे. महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ नवव्यांदा आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. तर पाकिस्तान संघाला फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचं पारडं जड आहे. आता विजयी सलामी कोण देतं याकडे नजरा लागून आहेत.
