राष्ट्रपतींच्या आग्रहावरून लता मंगेशकरांनी गायले पहिले भोजपुरी गाणे, चित्रपट ठरला सुपरहिट
पहिलं भोजपुरी गाणं, जे राष्ट्रपतींच्या आग्रहामुळे लता मंगेशकर यांनी गायलं. जे प्रदर्शित होताच ठरलं प्रचंड सुपरहिट. आजही त्या गाण्याचे आहेत लाखो चाहते.

भोजपुरी चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या पहिल्या चित्रपटातील पहिले गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. विशेष म्हणजे हे गाणे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहाखातर भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या बहिणी उषा मंगेशकर यांच्यासोबत गायले होते. हे गाणे केवळ सुपरहिटच ठरले नाही तर संबंधित चित्रपटानेही कमाईचे विक्रम मोडत भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली.
आज भोजपुरी चित्रपटसृष्टी देशातील सर्वाधिक लोकप्रिय प्रादेशिक चित्रपटसृष्टींपैकी एक मानली जाते. मात्र तिची सुरुवात सुमारे 63 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1963 मध्ये, ‘गंगा मैया तोहे पियरी चढइबो’ या चित्रपटातून झाली. हा भोजपुरी भाषेतील पहिला चित्रपट ठरला.
या चित्रपटात नजीर हुसेन, कुमकुम आणि असीम कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथानक आणि भावनिक मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्या काळात चित्रपट पाहण्यासाठी लोक बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांमधून दूरदूरच्या गावांतून थिएटरमध्ये पोहोचत असत.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहामुळे लता मंगेशकर यांनी गायले गीत
या गाण्यामागे एक अत्यंत रंजक किस्सा आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे भोजपुरी भाषेवर विशेष प्रेम होते. बिहारमध्ये जन्मलेल्या डॉ. प्रसाद यांची एकदा अभिनेते आणि लेखक नजीर हुसेन यांच्याशी भेट झाली. त्या वेळी भोजपुरी भाषेत चित्रपट बनवण्याचा विषय निघाला.
लेखक अभिजीत घोष यांच्या ‘सिनेमा भोजपुरी’ या पुस्तकानुसार, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी नजीर हुसेन यांना भोजपुरी भाषेत चित्रपट तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘गंगा मैया तोहे पियरी चढइबो’ हा पहिला भोजपुरी चित्रपट साकारला गेला.
चित्रपटातील पहिले गाणे कोणाच्या आवाजात असावे, याबाबतही डॉ. प्रसाद यांची स्पष्ट इच्छा होती. त्या काळात लता मंगेशकर यांच्या आवाजाला यशाची हमी मानली जात होती. त्यामुळे त्यांनी स्वतः लता मंगेशकर यांना हे गाणे गाण्याची विनंती केली. राष्ट्रपतींची विनंती लता दीदींनी मान्य केली आणि उषा मंगेशकर यांच्यासह हे ऐतिहासिक गाणं रेकॉर्ड केले.
चित्रपटाने रचला यशाचा नवा इतिहास
अवघ्या पाच लाख रुपयांच्या खर्चात तयार झालेल्या ‘गंगा मैया तोहे पियरी चढइबो’ या चित्रपटाने त्या काळात अभूतपूर्व यश मिळवले. चित्रपटातील गाणी आणि संगीतही प्रचंड लोकप्रिय झाले.
