गोविंदाचा पडता काळ सुरू, खरंच तो दिवाळखोरीत? चर्चांवर भाच्याने सोडलं मौन
अभिनेता गोविंदाचं खासगी आयुष्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या आर्थिक स्थितीबद्दलच्या बातम्या समोर आल्या होत्या. गोविंदा दिवाळखोरीत गेल्याचं त्यात म्हटलं गेलं. यावर आता भाच्याने मौन सोडलं आहे.

अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. एकीकडे पत्नी सुनीता अहुजाकडून त्याच्यावर विवाहबाह्य संबंधासारखे गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे गोविंदा चक्क दिवाळखोरीत गेल्याची चर्चा सुरू झाली. गोविंदाचा पडता काळ सुरू झाल्याचं अनेकांनी म्हटलं आणि यासंदर्भातील बातम्याही समोर आल्या. आता यावर त्याचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत विनयने गोविंदाविषयीच्या या सर्व अफवांना फेटाळलं आहे. अशा गोष्टी इतक्या प्रमाणात कशा पसरवल्या जातात, असा सवाल करत त्याने आश्चर्य व्यक्त केलं.
विनय आनंद म्हणाले, “तो सुपरस्टार आहे. गोविंदा आजसुद्धा जिथे उभा राहतो, तिथे त्याला 25 ते 30 लाख रुपये आरामात मिळतात. हे लोक ज्याला गरीब म्हणत आहेत, ते मूर्ख आहेत. लोक लिहितायत की गोविंदा रस्त्यावर आलाय, गोविंदासोबत हे घडलंय, ते घडलंय. अरे मूर्खांनो.. कोणाबद्दल तुम्ही ही बडबड करत आहात? तो नव्वदच्या दशकातील सुपरस्टार आहे, जो लाखोंची कमाई करतोय. जेव्हा अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरातील फ्लॅटची किंमत 12 ते 13 लाख रुपये होती, तेव्हा गोविंदा त्याच्या चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घ्यायचा. मग तो दिवाळखोरीत कसा जाईल? गोविंदाने पाच चित्रपटांमधून जेवढी कमाई केली, तेवढी कदाचितच कोणी कमाई केली असेल. असे कितीतरी स्टार्स फिरत असतील, ज्यांच्याकडे पैसे नाहीत. मला त्याच्याबद्दल ऐकूनच खूप अजब वाटतं.”
“हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं की आपल्या देशात कसे लोक आहेत? मीडिया कोणत्या प्रकारच्या कहाण्या लिहितोय, तेसुद्धा फक्त पब्लिसिटीसाठी. मी सोशल मीडियावर उघडतो तेव्हा गोविंदाच दिसतो. अरे, हे कशा पद्धतीचं स्टारडम आहे”, असं तो पुढे म्हणाला.
याआधी गोविंदाच्या मॅनेजरने दिवाळखोरीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले होते, “गोविंदाचं खाजगी कार्यक्रम, शाळांमधील डान्स आणि टॅक्सीने प्रवास यांचा त्याच्या आर्थिक अडचणींशी काही संबंध नाही. गोविंदाकडे फक्त एकच नाही तर अनेक गाड्या आहेत. त्याच्या दिवाळखोरीच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. परफॉर्मन्स हा त्याचा बिझनेस आहे. त्यामुळे तो दिवाळखोरीत आहे असा अर्थ होत नाही. त्यावेळी विमानतळावर खाजगी वाहनांना परवागनी नव्हती. तो अजूनही त्याच्या पत्नी आणि मुलांची काळजी घेतो.”
