जो आमिर खानला मारून टाकेल, त्याला 5 कोटी रुपये..; जगदगुरू परमहंस यांचं वादग्रस्त वक्तव्य
अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. करण सेनापासून राजकारणी व्यक्तींनीही त्याच्या या लग्नावरून टीका केली आहे. आता तपस्वी छावणीचे पिठाधीश्वर यांनी थेट आमिरला जीवे मारणाऱ्याला पाच कोटी रुपये बक्षीसाची घोषणा केली आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. 5 जुलै 2026 रोजी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. मात्र या लग्नावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आमिरला थेट ‘लव्ह जिहादचा ब्रँड एम्बेसेडर’च म्हटलं आहे. त्यानंतर आता तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगदगुरू परमहंस आचार्य यांनीसुद्धा नितेश राणेंच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आमिर खानला जीवे मारणाऱ्याला पाच कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
जगदगुरू परमहंस आचार्य म्हणाले, “ज्याप्रकारे आमिर खानने तीन लग्न केले आहेत आणि तिन्ही लग्न हिंदू महिलांशी केले आहे, त्यावरून हे दिसतंय की आता मरण्याच्या वयात तो फक्त ‘लव्ह जिहाद’चा संदेश देण्यासाठीच असा करतोय. नितेश राणे यांनी जे म्हटलंय ते फक्त आरोप नाहीत तर सत्य परिस्थिती आहे. अशा लोकांना जिथे दिसतील तिथेच मारून टाकलं पाहिजे.”
पहा व्हिडीओ-
Ayodhya, Uttar Pradesh: On Maharashtra Minister Nitesh Rane calling actor Aamir Khan the ‘brand ambassador of love jihad,’ Jagadguru Paramhans Acharya, Peethadheeshwar of Tapasvi Chhawani, says, “Given that Aamir Khan has married three times, and all three marriages were to Hindu… pic.twitter.com/HXUKFU5bme
— IANS (@ians_india) July 14, 2026
याविषयी ते पुढे म्हणाले, “हे समाजातील मोठे गुन्हेगार आहेत, जे परस्पर सलोखा बिघडवण्यासाठी आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे कट रचत आहेत. मी पाच कोटी रुपयांचं बक्षीसदेखील जाहीर करत आहे. जो कोणी कोणत्याही प्रकारे आमिर खानला पकडेल, आम्ही त्याचा कायदेशीर खर्च उचलू आणि त्याच्या कुटुंबाला पाच कोटी रुपये देऊ. जर असं 100-200 मोठे लव्ह जिहादी पकडले गेले, तर लव्ह जिहाद पूर्णपणे थांबेल.”
तपस्वी छावणीच्या प्रमुख पुजाऱ्यांनीही हे अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. “जर एका धर्मात आपल्या देवदेवतांची पूजा करण्यास मनाई असेल, तर ते आपल्या धर्मातील मुलीला कसं काय घेऊन जाऊ शकतात? हिंदू बहिणी आणि मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या अशा लोकांना जिवंत सोडणं चुकीचं आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं पाहिजे. मी उघडपणे सांगतो की, ज्यादिवशी कोणी आमिर खानला ठार मारेल, त्यादिवशी त्याच्या घरी पाच कोटी रुपये पोहोचवले जातील.”
आमिर खानने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. या दोन्ही पूर्व पत्नींपासून त्याला तीन मुलं आहेत. जुनैद खान, आयरा खान आणि आझाद राव खान अशी त्यांची नावं आहेत. आता वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं आहे.
