‘कोकण हार्टेड गर्ल’ने ‘अँटिलिया’मध्ये घेतलं हक्काचं घर; म्हणाली ‘पेडर रोडवर अंबानींच्या..’
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकरने हक्काचं घर घेतलं असून त्याचे फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रिस्क घ्यायची हिंमत असेल, तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं, असं तिने म्हटलंय.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर हिने तिचं सर्वांत मोठं स्वप्न नुकतंच पूर्ण केलं आहे. हक्काचं घर घेण्याचं तिचं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईत आल्यापासून अंकिताचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. पेडर रोडवरून फेऱ्या मारतान अंबानींच्या ‘अँटिलिया’समोर ती उभी राहायची आणि एकेदिवशी माझंही घर होईल, अशी स्टोरी इन्स्टाग्रामवर टाकायची. मुंबईत आल्यापासून ते घर घेण्यापर्यंतचा हा तिचा प्रवास कसा होता, याविषयी ती या पोस्टद्वारे व्यक्त झाली आहे.
अंकित वालावलकरची पोस्ट-
‘घर घेणं.. हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते, पण मनात एकच विचार “माझं घर कधी?” मी कुठेतरी वाचलं होतं, स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची. कारण लायकी आपण वाढवू शकतो. पण छोटं स्वप्न मोठं होत नाही. मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल. मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे. अंबानींच्या अँटिलियासमोर उभी राहायचे. त्या उंच इमारतीकडे बघायचे आणि स्टोरी टाकायचे “एक दिन मेरा भी घर होगा.” लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती. विश्वाला केलेली एक शांत हाक होती. आज विचार केला तर अंगावर शहारे येतात आणि योगायोग बघा आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे, त्या टॉवरचं नाव आहे ‘अँटिलिया’. हा योगायोग आहे? की स्वामींची इच्छा?’, असं तिने लिहिलं.
या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘मी जिथे नोकरी करायचे तिथले आमचे काँट्रॅक्टर पटेल गुजरातीमध्ये म्हणायचे, “रोटला मले इजी छे, पन मुंबई मा घर माले मुश्कील छे”. रोटी कमवणं सोपं आहे पण मुंबईत स्वतःचं घर? खूप अवघड. त्या वाक्याने पण मी कधी घाबरले नाही, उलट ठरवलं होतं, एक दिवस मीच माझ्या घराच्या चाव्या हातात घेणार! लग्नानंतर हे ‘माझं’ स्वप्न ‘आमचं’ झालं. कारण आता घर फक्त चार भिंती नव्हत्या, ते आमचं भविष्य होतं, आमची सुरक्षितता होती. वर्षभर आम्ही घरांच्या शोधात भटकलो. प्रत्येक घरात गेलो, पण मन म्हणायचं “नाही.. अजून नाही.” एक वेळ अशी आली की स्वप्न थोडंसं शांत झालं. “कदाचित अजून वेळ आहे” असं आम्ही स्वतःलाच समजावलं आणि मग अचानक हे घर समोर आलं. दरवाजा उघडला आणि मन म्हणालं “हेच!”
‘पण आकडेमोड तयार नव्हती. मन धजावत नव्हतं. भविष्याचं ओझं जड वाटत होतं. मी कुणालचा हात पकडला आणि हसत म्हटलं “उडी मारली की पोहायला येतंच.” त्यादिवशी रात्रभर आम्हाला झोप लागली नाही, खूप भीती वाटत होती. कुणालला तर खूप जास्त भीती वाटत होती. पण मला स्वप्नावर विश्वास होता आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला. भीतीपेक्षा मोठं आपलं स्वप्न आहे. रिस्क घ्यायची हिंमत असेल, तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं. आज या चाव्या हातात आहेत आणि मनात एकच भावना.. या पृथ्वीवर आमची स्वतःची एक जागा आहे. छोटी असेल पण आमची आहे आणि ती आम्ही दोघांनी उभी केली आहे. अभिमान पैशांचा नाही. अभिमान आहे त्या प्रवासाचा. जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा. उशीर झाला तरी चालेल पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीने बांधलं जातं. त्या दिवशी मी अँटिलियाकडे बघत होते. आज माझ्या अँटिलियामध्ये उभी आहे,’ असं तिने पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.
