गायक सिद्धार्थ मुकुंद जाधव : मराठवाड्यातील वामनदादांचा ‘साथसंगतकार’!
प्रसिद्ध गायक, ढोलकीवादक सिद्धार्थ मुकुंद जाधव यांना महाकवी वामनदादा कर्डक यांचे साथसंगतकार म्हणूनही ओळखलं जातं. वामनदादांचे औरंगाबाद, जालन्यात कार्यक्रम असेल तर सिद्धार्थ जाधव यांची त्यांना हमखास साथ असायची. (Siddharth mukund Jadhav)
मुंबई: प्रसिद्ध गायक, ढोलकीवादक सिद्धार्थ मुकुंद जाधव यांना महाकवी वामनदादा कर्डक यांचे साथसंगतकार म्हणूनही ओळखलं जातं. वामनदादांचे औरंगाबाद, जालन्यात कार्यक्रम असेल तर सिद्धार्थ जाधव यांची त्यांना हमखास साथ असायची. वामनदादांनीच त्यांच्यातील कलावंत हेरला. ढोलकीपटू असलेल्या जाधवांना गाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ते गायक म्हणून नावारुपाला आले. एवढेच नव्हे तर वामनदादांनी त्यांना गाणी लिहिण्याचे आदेश दिले आणि गीतकार, कवी म्हणूनही त्यांची दुसरी ओळख निर्माण झाली. सिद्धार्थ जाधव यांच्या आयुष्यावर टाकलेला हा प्रकाश… (singer siddharth mukund jadhav a disciple of wamandada kardak)
वामनदादा भेटले अन्…
1963 मध्ये खानदेशातील शेंदूर्णी येथे धर्मचक्र परिवर्तन दिना निमित्त जंगी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी महाकवी वामनदादा कर्डक आणि शांताबाई कर्डक आले होते. यावेळी दोघांनीही उभे राहून भीमगीत गायलं होतं.
सारे मानव प्राणी, ना उच्च ना नीच कोणी, कुणीही यावे शुद्ध बनावे, बुद्धाच्या चरणी…
वामनदादा आणि शांताबाई कर्डक यांनी हे गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली होती. त्यामुळे तब्बल दहा मिनिटं हजारो जनतेने टाळ्यांचा कडकडाट केला होता. तेव्हाच वामनदादांना आपण प्रत्यक्ष भेटलं पाहिजे, अशी तीव्र इच्छा सिद्धार्थ जाधव यांच्यात मनात निर्माण झाली. त्यानंतर 1965मध्ये औरंगाबाद येथे प्राध्यापक गरुड सर वामनदादांना घेऊन आले. त्यावेळी वामनदादांचा पहिला कार्यक्रम पैठणगेट येथे झाला. यावेळी सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या पाच सहा सहकाऱ्यांनी वामनदादांना साथ संगत केली. तेव्हापासून त्यांची वामनदादांची ओळख झाली आणि वामनदादांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. तू माझ्यासोबत ढोलकीवादक म्हणून राहा, असं वामनदादांनी त्यांना सांगितलं. सिद्धार्थ जाधव यांनीही वामनदादांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे 2004पर्यंत हे वचन पाळलं.
अन् पार्टी स्थापन केली
वामनदादांच्या सोबत राहिल्यामुळेच गाणी गाता गाता आंबेडकरी चळवळीतही त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. ढोलकी वादन करतानाच गायक म्हणूनही ते नावारुपाला आले आणि कलावंत म्हणून त्यांची ओळखही निर्माण झाली. वामनदादांचे साथसंगतकार म्हणूनही त्यांची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली. एवढेच नव्हे तर वामनदादांच्या आदेशामुळेच सिद्धार्थ जाधव यांनी गाणी लिहिण्यासा प्रारंभ केला. वामनदादा विजयादशमीपासून ते जून महिन्यापर्यंत संपूर्ण राज्यभर कार्यक्रम करत. फक्त पावसाळ्याचे चार महिने ते नाशिकच्या वडाळा नाका येथील घरात राहत. 1975मध्ये वामनदादांनीच जाधव यांच्या नावाने एक गायन पार्टीही स्थापन केली. त्यानंतर जाधव यांनीही मागे पाहिले नाही. त्यांनीही ही पार्टी घेऊन गावोगावी जाऊन समाजप्रबोधनाचे कार्यक्रम केले.
उद्यानाला असं पडलं ‘सिद्धार्थ’ नाव
1974 मध्ये सिद्धार्थ जाधव हे औरंगाबाद महापालिकेत नोकरीला लागले. 1976मध्ये त्यांच्याकडे औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या उद्यानाचा एक किस्सा आहे. या उद्यानाला पंडीत जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी या दोन्ही पैकी एक नाव देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हाच्या औरंगाबाद नगरपरिषदेने हा प्रस्ताव तयार केला होता. प्रशासक बरीदे साहेब यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवण्यात आला. या दोन नावांपैकी एक नाव देण्याचं पक्क ठरलं. ही फाईल बरीदे साहेबांकडे पडून होती. दोन दिवसानंतर ते उद्यानात आले. त्यांनी उद्यानातील झाडांची देखभाल कोण करतं असं वॉचमनला विचारलं. वॉचमनने जाधव यांना बरीदे साहेबांपुढे उभे केलं. त्यावेळी साहेबांना बघून जाधव यांची घाबरगुंडी उडाली होती. अंग घामाघूम झालं होतं. ते थरथर कापत होते. आपली काही चूक झाली का? नोकरी तर जाणार नाही ना? या भीतीने त्यांच्या काळजात धस्स झालं होतं. परंतु, बरीदे साहेबांनी जवळ बोलावून नवीन लावलेल्या नारळाच्या झाडांची आणि इतर झाडांची माहिती विचारली. जाधव यांनी या झाडांची माहिती सांगतानाच त्याचे फायदे आणि संगोपन कसे करायचे याची इत्थंभूत माहिती बरीदे साहेबांना दिली. साहेब खूश झाले.
त्यानंतर बरीदे साहेबांनी विचारलं तुझं नाव काय? त्यावर जाधव यांनी माझं नाव जाधव आहे, असं सांगितलं. तीनवेळा साहेबांनी हाच प्रश्न केला. जाधव यांनीही तीन वेळा जाधव हेच आपलं नाव असल्याचं सांगितलं. त्यामुळे साहेब थोडे चिडले. म्हणाले, अरे वेड्या तुझं पूर्ण नाव काय? त्यावर सिद्धार्थ मुकुंद जाधव, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर साहेब निघून गेले. मात्र, दुसऱ्याच दिवशी या उद्यानाला ‘सिद्धार्थ उद्यान’ हे नाव देण्यात आलं. प्रस्तावात आलेली दोन्ही नावे बाद ठरवून त्यांनी या उद्यानाला ‘सिद्धार्थ’ हे नाव दिलं. त्यामुळे जाधव यांनाही आश्चर्य वाटलं होतं. भगवान गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ आहे. शिवाय मी उद्यानाची देखभाल करत होतो. त्यामुळे सिद्धार्थ हे नाव साहेबांना क्लिक झालं असावं त्यामुळेच त्यांनी उद्यानाला हे नाव दिलं असावं, असं जाधव सांगायचे.
जाधव यांची गाजलेली गाणी
ना आमदार, ना मंत्री, श्रीमंती पाहिजे, भीमविचाराचा, एक नेता पाहिजे…
आणि
आरं मर्दा रं, मर्दा रं, आता ध्यानात ठेवायचं, भीम बाबाचं, बाबाचं वचन पाळायचं, गटबाजीला मातीत गाडायचं, सारे मिळूनं एकीनं वागायचं…
आणि
संविधानामुळे झाला फायदा रं, असा भीमानं लिहिला कायदा रं…
आणि
एक भगवा एक निळ्याने , जगी केली या कमाल, एक जिजाईचा लाल, एक भीमाईचा लाल…
आणि
सोन्याचं पानदानं, हळदी कुंकानं घासीनं, माझ्या भीमाचा प्रसाद, उभ्या गल्लीनं वाटीन गं… सई बाई… (singer siddharth mukund jadhav a disciple of wamandada kardak)
संबंधित बातम्या:
गावात जलसा आला अन् मराठवाड्याला नवा गायक मिळाला; वाचा, सिद्धार्थ जाधव यांची कहाणी!
विष्णू शिंदे : वंचित कलावंतांच्या मानधनासाठी झटणारा गायक!
मराठवाडा पेटलेला असतानाही समाजप्रबोधन; चळवळ्या गायक विष्णू शिंदे!
(singer siddharth mukund jadhav a disciple of wamandada kardak)